15/05/2026
मानसिक आरोग्य क्षेत्रातील बाप माणूस आज
आपल्यातून निघून गेला अत्यंत दुःखद घटना
नाडकर्णी सरांनी समाजाला मानसिक आरोग्य कडे पहाण्याची एक नवी दृष्टी दिली,
रिफ्लेक्शन फाऊंडेशन कडून भावपूर्ण श्रद्धांजली !
04/05/2026
नरसापुरसारख्या घटनांवर समाजाची भूमिका — केवळ सरकार पुरेसे नाही
काल घडलेल्या नरसापुर प्रकरणामुळे जनक्षोभ उसळलेला दिसतो. अशा घटना घडल्या की समाजात संताप निर्माण होणे स्वाभाविक आहे आणि सरकारने यावर ठोस भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. मात्र, हा प्रश्न फक्त आजचा नाही. यापूर्वीही मालेगाव, कलकत्ता यांसारख्या प्रकरणांमुळे विशेषतः तरुण मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढलेली आहे.
पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे — या घटनांसाठी केवळ सरकार आणि पोलीसच जबाबदार आहेत का?
वास्तविक पाहता, समाजाची जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे. आज समाजात “मला काय त्याचं?” ही भूमिका वाढताना दिसते. अन्याय आपल्या कुटुंबाबाहेर घडत असेल, तर आपण दुर्लक्ष करतो. हीच उदासीनता अशा गुन्ह्यांना खतपाणी घालते.
पूर्वी समाजात एक प्रकारचा सामाजिक धाक होता. चुकीचे कृत्य केल्यास समाजाकडून निषेध, बहिष्कार किंवा दबाव येईल, ही जाणीव लोकांमध्ये होती. आज मात्र तो सामाजिक दबाव कमी झाल्यामुळे केवळ कायद्याच्या भीतीवर समाज चालत आहे. आणि हे स्पष्ट आहे की केवळ कायद्याच्या धाकाने असे प्रश्न पूर्णपणे सुटत नाहीत.
यासाठी समाजाने स्वतःकडे अंतर्मुख होण्याची गरज आहे:
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो का?
अन्याय दिसल्यास आपण आवाज उठवतो का?
गरज पडल्यास संबंधित यंत्रणांपर्यंत तक्रार पोहोचवतो का?
आजच्या घडीला तरुण मुली प्रचंड भीतीच्या वातावरणात जगत आहेत. अनेक सत्रांमध्ये हे जाणवते की त्यांना सतत भीती वाटते — “अशा घटना वाढल्या तर आमचे शिक्षण थांबेल का?”, “आम्हाला बाहेर पडता येईल का?”
जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुन्हा एकदा स्त्रियांना घरात बसवण्याची वेळ येऊ शकते — आणि हे समाजासाठी अत्यंत घातक ठरेल.
म्हणूनच, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.
समाजातील मोठ्यांनी लहानांना संरक्षण देणे ही केवळ जबाबदारी नाही, तर त्यांचा हक्क आहे.
पूर्वी “एक मूल हे संपूर्ण कुटुंब, गल्ली आणि गावाचे असते” अशी भावना होती. आज मात्र मुलांकडे केवळ आई-वडिलांची ‘खासगी मालमत्ता’ म्हणून पाहिले जाते. इतर कुणी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली जाते. ही मानसिकता समाजासाठी धोकादायक आहे, कारण त्यामुळे सामाजिक नियंत्रण आणि परस्पर जबाबदारी कमी होत जाते.
निष्कर्ष
सरकार आणि कायदा आपले काम करतीलच, पण समाजानेही आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली पाहिजे.
अन्यायाविरोधात आवाज उठवणे
चुकीच्या गोष्टींना वेळेत रोखणे
समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे
ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
“मला काय त्याचं” ही भूमिका बदलून “हे आपल्या समाजाचं आहे” अशी भावना निर्माण झाली, तरच अशा घटनांना आळा बसू शकतो.
आशा
Reflection
24/04/2026
बाल चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. खुल्या वातावरणात मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्याचा आनंद घेताना लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. चित्रपटातील संदेश, मनोरंजन आणि शिक्षण यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना भावला. कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखले गेले आणि सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला. एकूणच, महोत्सवाची सुरुवात अत्यंत यशस्वी ठरली.
23/04/2026
पालक शाळा, जळगाव चा नाविन्य पूर्ण उपक्रम !
08/04/2026
दिनांक ४ एप्रिल२०२६ रोजी रिफ्लेक्शन फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.त्या मध्ये
१ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष. श्री रत्नाकर पाटील
उपाध्यक्ष. मुक्ता खांडेकर
सचिव. डॉ. अश्विनी पंडित
कोषाध्यक्ष. अनघा डोरले
कार्यकारणी सदस्य
आशा खेडकर
शिवानी कुलकर्णी
प्राजक्ता सहस्त्रबुद्धे
विदुला पेंडसे
नितीन राख
निशा मुळे
नवीन कार्यकारणीतील सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🌹🌹
08/04/2026
मार्च २०२६ यामध्ये टिळक शिक्षण महाविद्यालय व रिफ्लेक्शन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एडच्या विद्यार्थ्यांसाठी *राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा* चे आयोजन केले होते.
या स्पर्धेचा निकाल २ एप्रिल २०२६ ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या कार्यक्रम प्रमुख पाहुणे गरवारे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख या. मा. डॉ. वर्षा तोडमल ह्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य प्रा. दिपक चव्हाणसर होते. कार्यक्रमात टिळक महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व रिफ्लेक्शन फाऊंडेशनचे कार्यकर्ते व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धेचा उद्देश काय आहे, टिळक महाविद्यालयाचे व रिफ्लेक्शन फाऊंडेशनची थोडक्यात माहिती सांगितली.
प्रमुख पाहुणे वर्षाताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्ता कसा घडतो, वक्तृत्व स्पर्धांसाठी कशी तयारी केली पाहिजे, आपला अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, हे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सरांनी अशा स्पर्धांची का गरज आहे,व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे असे सांगितले.
शेवटी निकाल जाहीर झाला.सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
*निकाल*
▪️ मराठी विभाग
🔹 प्रथम क्रमांक
सुनंदा कांबळे
🔹 व्दितीय क्रमांक
पियुषा नाईक
🔹 तृतीय क्रमांक
रोहिणी इचके व भक्ती नायब (विभागून)
▪️ इंग्रजी विभाग
🔹 प्रथम क्रमांक
रिया पांडेय
🔹 व्दितीय क्रमांक
मानसी कुंभार
🔹 तृतीय क्रमांक
गार्गी सेठ
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बी.एड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.