31/05/2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदिवासी समाजातील वधू-वरांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विवाह सोहळा दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता साई मंदिर हॉल, लोहारपाडा, मोरखाडा येथे संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश जाधव आयोजित या सामूहिक विवाह सोहळ्यात अनेक आदिवासी वधू-वर विवाहबंधनात अडकणार आहेत.
30/05/2026
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुलुंड ‘प’ प्रभागातील प्रभाग क्रमांक १०८ मधील डोंगराळ भागातील नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘टी’ विभाग कार्यालयावर मडकं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मडकं मोर्चाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला. परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून पाणीप्रश्नाबाबतचा आपला रोष व्यक्त केला व आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
28/05/2026
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत.
आणि सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का ?
सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं.
हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे. सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे. आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत.
उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय. याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत ? आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे.
आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
26/05/2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक ५ चे शाखा अध्यक्ष श्री. हर्षद सतीश सावंत यांच्या नव्या व्यवसायाची — ICE Cargo Company — दिमाखदार सुरुवात सन्मानीय श्री.राज साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
या उद्घाटन सोहळ्यावेळी कंपनीचे CEO रुपेश सावंत तसेच वैभव सावंत, सचिन खानविलकर, संदीप हरियान, मनीष गुरव, संकेत पवार आणि महेश साटम ही संपूर्ण टीम उपस्थित होती.
नवीन व्यवसायाच्या या प्रवासासाठी संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी माणूस उद्योगाच्या क्षेत्रात अशीच नवी उंची गाठत राहो हीच सदिच्छा.
26/05/2026
सन्मानीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते वर्सोवा विधानसभेतील प्रभाग क्रमांक ६० येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न संपन्न झाले. उदघाट्न सोहळ्यातील काही विशेष क्षणचित्रे.