11/04/2025
*आपले हात आमची साथ*
आज यशवंतराव चव्हाण विकास प्रतिष्ठान मुंबई येथे मंडळाचा ६५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश आणि व्याप्ती पाहता प्रत्यक्षात कार्यक्रमाची सांगता ज्या प्रकारे झाली त्यामुळे प्रस्तुतचा कार्यक्रम हा आजअखेर मंडळाने घेतलेल्या सर्व कार्यक्रमातील अग्रेसर असा कार्यक्रम म्हणावा लागेल कारण या कार्यक्रम प्रसंगी दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र शासनाचे उद्योग विभागाचे सर्वेसर्वा नामदार उदयजी सामंत मंत्री महोदय तसेच प्रधान सचिव उद्योग - डॉ.पी अनबलगन या दोघांची एकाच व्यासपीठावर एकत्र उपस्थिती आणि ती देखील मंडळाच्या वर्धापन दिनी हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल.
प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करून दीप प्रज्वलित करण्यात आले.प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.आजच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळाचे प्रचार प्रसिद्धी मध्ये विशेष उल्लेखनीय काम करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री बिपिनजी जगताप सर यांच्या संकल्पनेतून मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी तसेच योजना विषयी आणि खातेनिहाय केंद्रांविषयी सविस्तर चर्चा घडविण्यात आली. या चर्चेच्या माध्यमातून मंडळाचे अंतरंग उकलण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने मध संचालनालय महाबळेश्वर आणि हातकागद प्रशिक्षण संशोधन तथा उत्पादन संस्था पुणे यांच्या कार्याचा ऊहापोह करण्यात आला सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नित्यानंद पाटील सर यांनी हातकागद निर्मिती,हात कागदाची शाश्वतता आणि हात कागदातील भविष्यातील संधी याचे फार समर्पक आणि सुंदर असे समालोचन केले. त्यांच्या वक्तव्यातून आपले कर्तव्य जबाबदारपणे पार पाडणारे अधिकारी हे मंडळाकडे कमी नाहीत याची ख्याती आली तसेच अंबर चरख्याच्या माध्यमातून नागपूर येथे खादीचे सोलर चरख्याच्या माध्यमातून खादी उत्पादित करणे किती अत्यावश्यक आहे याची सर्वांना जाण करून देणारे मंडळाचे जाणकार आणि हुशार व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीप जी चेचरे सर यांनी आपल्या प्रयत्नातून स्थापन केलेल्या संस्थेविषयी सर्वांगीण माहिती दिली प्रसंगी खादी व ग्रामोद्योग आयोग राज्य निदेशक श्री योगेश जी भामरे यांना मंडळासाठी काही जाचक अटी नियम शिथिल करण्याविषयी विनंती करण्यात आली जेणेकरून मंडळ देखील खादी आयोगाच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात काम करू शकेल आणि पर्यायाने खादीचा सर्वांगीण विकास घडू शकेल.याच वेळी मंडळाचे ज्येष्ठ अधिकारी आदरणीय सुधीर केंजळे सर यांनी देखील मंडळाची उपयुक्तता अगदी समर्पक मांडली.
मंडळाच्या नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या आदरणीय गीतांजली बाविस्कर मॅडम यांनी देखील या कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आयोजन तसेच मुद्देसूद नियोजन याचे बारकावे त्यांनी स्वतःहून जाणून घेतले आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यक्रम राबविला आणि तो यशस्वी देखील घडवून दाखविला.
आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी स्वतःची संकल्पना स्पष्ट केली आणि भविष्यात खादीसाठी जे काही करायचे आहे त्याची जंत्री वाचून दाखवली. थोडक्यात एक उत्तम प्रशासक म्हणून पदभार आणि कार्यभार स्वीकारल्यानंतर ज्या प्रकारे आपली उद्योगनीती अथवा कार्यपद्धती सादर करायची असते थोडक्यात त्याचा लेखाजोखा जाहीरपणे मांडणाऱ्या आदरणीय मॅडम मंडळास लाभलेलं एक उमद व्यक्तिमत्व आहे याची आज ओळख झाली कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्री नित्यानंद पाटील सर यांचा सिंहाचा वाटा निश्चितच आहे परंतु त्याच बरोबर त्यांच्या टीमने देखील भरपूर कष्ट घेतले. मार्च अखेरीच्या लेखांच्या कामामुळे लेखा विभाग या कामांमध्ये सहभाग घेऊ शकला नाही त्याबद्दल खंत निश्चितच वाटते.
माननीय उद्योग मंत्री महोदय यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मंडळाचा केलेला उल्लेख, त्यांना खादी मुळे राजकारणात झालेला फायदा यामुळे त्यांच्या तरुणपणी त्यांची मंडळाशी जोडलेली नाळ ही किती घट्ट आहे याचे पुन्हा एकदा उदाहरण देऊन मंडळाविषयीची अस्मिता आणि आपलेपणा दाखवून दिला;भविष्यात मंडळास सर्वतोपरी झुकते माप देण्याचा व शासन दरबारी मंडळाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा माझा स्वतःचा फार मोठा सहभाग राहील अशी त्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा देखील केली.
मंडळाचे आदरणीय सभापती महोदय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष सांगताना केवळ राज्यमंत्री दर्जा हा त्यांच्यासाठी मर्यादित नसून दस्तूर खुद्द सभापती महोदय हे आपल्या मंडळाचे मंत्री आहेत तसेच त्यांच्या सर्जनशील आणि नवोन्मेष प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्वाने विशेष भारावून काम करण्याची ऊर्जा आणि उर्मी कशी असावी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती महोदय हे आहेत याच्यावर शिक्कामोर्तब केले.आजच्या या समारंभास मंडळाचे सर्व आजी-माजी कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते मंडळाच्या इतिहासात प्रथमच असा आगळावेगळा कार्यक्रम अनुभवायला मिळाला यापूर्वीही अनेक कार्यक्रम,समारंभ, शिबिरे,प्रशिक्षण वर्ग तसेच प्रदर्शने घेण्यात आली परंतु तत समयी अनेक प्रकारे गर्दी जमवण्याची गरज भासत होती परंतु आजच्या या कार्यक्रमास आसन क्षमतेहून अधिक संख्या उपस्थित होती हेच आजच्या कार्यक्रमाचे यश आहे आणि ही मंडळाची तसेच मंडळाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या साठी फार मोठी उपलब्धी आहे.या कार्यक्रमाला मंचावर मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डांगर सर उपस्थित होते तर मंडळाच्या अर्थ सल्लागार व मुख्य लेखाधिकारी स्मिता खरात मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उशीर झाल्याने माननीय सभापती महोदय यांनी स्वतः उपस्थित सर्वांचे आभार मानले.
- अमर राऊत
जेष्ठ पर्यवेक्षक मुंबई
15/02/2025
https://www.facebook.com/share/p/18daUeQr5q/?mibextid=wwXIfr
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे "उत्तुंग महाखादी प्रदर्शन" आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्स, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार असून, दररोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनात खादी वस्त्र, खादी साड्या, शुद्ध सेंद्रिय ‘मधुबन’ मध, हळद, मसाले, कोल्हापूरी चप्पल, गूळ तसेच इतर ग्रामोद्योग उत्पादने यांसारख्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.
02/10/2024
मंडळाच्या मुख्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी सभापती मा रवींद्र साठे यांनी मार्गदर्शन केले मंडळाचा वार्षिक अहवाल या वेळी प्रकशित करण्यात आला. कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, राजकुमार डांगर नित्यानंद पाटील यांनी भाषणे केली यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
02/10/2024
सभापती रवींद्र साठे यांचे विचार 🎉🎉
29/08/2024
मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.(भा प्र.से ) यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी मंडळाच्या अर्थसल्लागार व मुख्यालेखाधिकारी स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक मुकाअ नित्यांनद पाटील, मध संचानालय संचालक रघुनाथ नारायणकर व सुजाता राऊत यांनी त्यांचे स्वागत केले.
21/08/2024
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात 'खादी महोत्सव'
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी सर्व भारतीयांना खादीचा कपडा खरेदी करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने पंतप्रधान त्यांच्या आवाहनास अनुसरून मंत्रालयात खादी महोत्सवाचे आयोजन केले आहे. आज दिनांक २१ ऑगस्ट रोजी या महोत्सवाची सुरुवात झाली आहे तर दिनांक २३ ऑगस्ट रोजी या महोत्सवाची समाप्ती होईल. महाराष्ट्रातील एकूण १२ स्टॉल्स जे खादी चे उत्पादक आहेत त्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे कपडे, जॅकेट्स, महिलांसाठी साड्या, ड्रेस, मध अशा प्रकारचे अनेक स्टॉल्स लागले आहेत. याप्रकारे ग्रामोद्योग मंडळाने हर घर खादी घर घर खादी . आपल्या घरामध्ये अन्य कपड्यांबरोबरच खादीचा कपडा असणे अशी घोषणा केली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी खादीचा कपडा खरेदी करावा. रुमाला पासून ते साडी पर्यंत काहीही असेल तर ते खरेदी करावे असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी केले आहे.
या प्रदर्शनाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी भेट देऊन खादी च्या विविध स्टाल ची पाहणी केली तसेच जास्तीत जास्त लोकांनी खादी खरेदी करणेबाबत आवाहन केले.
महाराष्ट्र राज्याच्या खादी मंडळाची ओळख आधी मधुबन मधाने होते. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणामध्ये आम्ही हे भव्य प्रदर्शन लावले आहे. माननीय पंतप्रधान यांनी आपल्याला एक कौल दिलाय की "हर घर खादी घर घर खादी. खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन अँड खादी फॉर ट्रान्सफोर्मेशन". प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकला तर हे संभव होऊ शकतं. मनाचा गोडवा आपल्या घरापर्यंत पोहोचवा. या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आलेल्या इको फ्रेंडली गणपती मूर्ती यंदा आपल्या घरात विराजमान करा. ८०० मुलींना या महोत्सवासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हाताने बनवलेले रुमाल आणि पंचे या स्टॉल्स च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इतर राज्यांमधून जसे की उत्तरप्रदेश आणि आसाम मधून काही लोक आले आहेत. विनोबा भावे यांची संस्था विनोबा ग्राम संघ, सेवाग्राम संस्था कडून खादी च्य वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या महोत्सवाचा आनंद घ्या असे आवाहन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी केले आहे.
000
14/08/2024
खादी : एक नवा अध्याय विणताना
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापना दिन सोहळ्याला, अलीकडच्या निवडणुकांमुळे थोडासा उशीर झाला असला तरी, स्थापना दिनाचे माझ्यासाठी विशेष महत्त्व आहे. छोट्या उद्योगांना 'उद्योग भरारी' पुरस्कार देताना माझ्या मनात खादीशी असलेल्या माझ्या नात्याच्या आठवणी जाग्या झाल्या.... खादीची एक साधी प्रशंसक म्हणून सुरुवात करून, तिची मुख्य कार्यकारी अधिकारी बनण्यापर्यंतचा माझा प्रवास खूपच भावनात्मक, आव्हानात्मक आणि नाविन्यपूर्ण शिकण्याचा राहिला आहे.
दिल्लीच्या कनॉट प्लेसमधल्या गजबजलेल्या खादी भांडाराला माझ्या आईसोबत भेट दिल्याचे मला आजही ठळक आठवते.हे खादी भांडार अजूनही भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे आणि त्याच वेळी खादीच्या जगातल्या संघर्षांची कडवी वास्तविकता मला सतत जाणवू देते. केवळ काही समर्पित खादी संस्था आणि विणकरच या प्रचंड मोठ्या वारशाचे जतन करण्यासाठी संघर्ष करत आहेत.
'मधुबन मध' जो महाराष्ट्रातील मध संचालनालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याच्या प्रचंड गुणवत्तेमुळे मला सतत गुंतवून ठेवतो....पण तरीही खादीचे आकर्षण त्यापेक्षा खूपच जास्त आहे कारण तो एक समृद्ध वारसा आहे जो केवळ तोंडदेखले कौतुक न करता खूप काही मागतो. खादी जी एकेकाळी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक होती, ती आता कमी होत चालली आहे, असे मला सतत वाटते.
याची अनेक कारणे असू शकतात. आधुनिक ग्राहकांना सतत बदलणारे आणि स्वस्त फॅशनचे कपडे आकर्षित करतात. त्याच्या तुलनेत, खादीची साधी रचना आणि पारंपरिक उत्पादन प्रक्रिया महागडी आणि कालबाह्य वाटू शकते. खादीला अनेकदा फक्त पारंपरिक कपड्यांसाठी योग्य मानले जाते, परंतु तिचा आधुनिक आणि बहुपयोगी फॅशन म्हणून वापर फारसा केला जात नाही. खादीची कपडे महाग असल्याने ते खरेदी करणे काही ग्राहकांना अडचण वाटू शकते. विणकारांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने ते देखील उत्पादन पुरेसे करत नाहीत.
अशा अनेक आव्हानांमुळेही खादी मागे पडत आहे पण टिकाऊ फॅशनसाठी वाढती मागणी ..खादी पर्यावरणपूरक असल्याने सहज आकर्षित करते. आम्हाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून, उत्पादन श्रेणी केवळ कपड्यांपर्यंत मर्यादित न ठेवता विस्तारीत करायला हवी. खादीचा वापर फक्त कुर्ता, जॅकेट शर्ट पुरताच मर्यादित न ठेवता, टॉवेल, रुमाल,घरगुती कपडे, महिलांचे दुप्पटे आणि अशा अनेक कपड्यांसाठी करता येईल. खादीचे पर्यावरणपूरक,आरामदायीपणाचे आणि टिकाऊपणाचे गुणविशेष ठळक करून एक मजबूत ब्रँड तयार करणे आवश्यक आहे. आधुनिक आणि स्टायलिश खादी कपडे तयार करण्यासाठी डिझाइन आणि अत्याधुनिक पिढीला आवडणारे कपडेमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. खादी कारागीरांचे सबलीकरण, त्यांच्या उत्पादनांना सवलत देणे आणि त्यांना चांगली साधने आणि बाजारपेठ मिळवून देणे यावर देखील भर दिला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना, खादीचा हाताने विणलेला आणि हाताने कातलेला धागा विशेषत्व कायम राखणे महत्त्वाचे आहे. खादी कारागीरांच्या कथा, त्यांचा संघर्ष आणि हस्तकला यांचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो.
आगामी काळ नक्कीच आव्हानात्मक आहे, परंतु याचे फळ खूप मोठे असू शकते. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बरोबरच सांगितले आहे की, खादी केवळ एक कपडा नाही; तो आपल्या वारशाचा, आत्मनिर्भरतेचा आणि टिकाऊपणाचे प्रतीक आहे. खादीला पुनरुज्जीवित करून, आपण कारागीर, पर्यावरण आणि राष्ट्रासाठी एक चांगली परिस्थिती निर्माण करू शकतो.
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापना दिनी, चला खादीच्या गौरवशाली इतिहासात एक नवा अध्याय विणण्याची शपथ घेऊया. मी माझे पूर्ण योगदान देण्याचे वचन देते....तुम्ही काय कराल?
- आर विमला
-मुख्य कार्यकारी अधिकारी
-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंड
11/08/2024
ग्रामोद्योग भरारी पुरस्कार जाहीर
09/08/2024
वर्धापनदिन कार्यक्रम : आपली उपस्थिती आवश्यक आहे.