09/08/2020
*भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज दिनांक ९ अॉगस्ट २०२० रोजी दर वर्षी महाराष्ट्रातून १० स्वातंत्र्य सैनिकांची महामहिम राष्ट्रपती महोदय यांचे हस्ते त्यांचा सत्कार नवी दिल्ली येथे केला जातो.*
परंतु या वर्षी *कोविड १९* प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन ९ अॉगस्ट २०२० रोजी स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे बोलावणे उचित ठरनार नसलेने उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने सदरचा कार्यक्रम राष्ट्रपती भवन येथे न होता तो निवड करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार शाल वस्ञ देऊन करण्याचे केंद्रीय गृह मंञालयाचे निर्देश होते.
त्यानुसार महाराष्ट्रातुन १० नावे केंद्र शासनाकडे सादर करण्यात आली होती.त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे कडुन स्वातंत्र्य सैनिक मा. *श्री.शंकर वासुदेव परांजपे राहणार फ्लॕट नं.६,अथर्व,प्रभातरोड,लेन नं ११,पुणे ०४* यांचेही नावही सत्कारासाठी पाठविण्यात आले होते.या १० नावामधे त्यांचेही निवड झालेने आज त्यांचा सत्कार केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मा.जिल्हाधिकारी यांचे वतेने *मा.उपविभागिय अधिकारी पुणे - शिरुर मा.श्री.संतोषकुमार देशमुख* यांनी त्यांचे राहत्या घरी जाऊन शाल वस्ञ देऊन स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार केला. तसेच यावेळी *मंडल अधिकारी पुणेशहर श्री.ठुबे* हेही उपस्थित होते तसेच परांजपे कुटुंबिय उपस्थित होते.
09/06/2020
*भामा आसखेड जलवाहिनीचे कामकाज व प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेणार*
*जिल्हाधिकारी नवल किशोर राम*
*प्रकल्प ग्रस्तांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध*
*भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी*
*शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून काम करण्यासाठी प्रशासन तत्पर*
*खेड तहसीलदार कार्यालयाला भेट व कामकाजाचा आढावा*
पुणे,दि.९: भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. जलवाहिनीचे कामकाज, प्रकल्प ग्रस्तांना जमीन वाटप, जमीनीचा मोबदला वाटप आदी प्रश्नांबाबत स्थानिक परिस्थिती पाहून व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल, तसेच पुढील आठवड्यात पुन्हा प्रकल्प ग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. प्रकल्प ग्रस्तांना रोख रक्कम वाटप करताना गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आज भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तत्पूर्वी खेड तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, पोलीस उपअधीक्षक गजानन टोणपे, तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना जमीन व मोबदला मिळवून देण्यात गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.
भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. खेड तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांच्या जमीन वाटपा बाबतचे व रोख रक्कम वाटपाचे कामकाज खेड उपविभागीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात येईल, असेही श्री. राम यांनी सांगितले.
यावेळी भामा आसखेड प्रकरणाचा आढावा घेऊन प्रकल्प ग्रस्तांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे हित पाहून काम करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या मान्यतेनुसार जमीन वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळवून द्यावा. शेतकऱ्यांना रक्कम वाटप करताना गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच भूमीहीन शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केल्या.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी 68 धरणग्रस्तांना जमिनीचे एकाच दिवसात वाटप केले, याबाबत जिल्हाधिकारी श्री राम यांना यावेळी प्रकल्प ग्रस्तांनी धन्यवाद दिले. यापुढेही प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
09/06/2020
*स्वयंशिस्त व समाज घटकांशी समन्वय ठेवून खेड तालुका कोरोनामुक्त करुया*
*- जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन*
*खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनासाठी समिती गठीत करा*
*निसर्ग चक्रीवादळ नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करा*
पुणे दि. 9 : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठे औद्योगिक क्षेत्र विस्तारले आहे. उद्योग धंद्यांवर परिणाम होवू नये, यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, त्याचबरोबर समाजघटकांशी चांगला समन्वय ठेवून खेड तालुका कोरोना मुक्त करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज खेड पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात महसूल, आरोग्य, व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय तेली, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, पोलीस उपअधीक्षक गजानन टोनपे, तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करीत आहेत. नागरिकांनीही सोशल डिस्टनसिंग, स्वच्छता विषयक खबरदारी घेऊन स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे श्री. राम म्हणाले.
जिल्हाधिकारी राम यांनी खेड तालुका परिसरातील कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, तालुक्यात रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना, बाहेरील जिल्हयातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भांत सुरु असलेली कार्यवाही, ज्येष्ठ नागरिक व कोमोर्बीडिटी रुग्णांसाठी आरोग्य तपासणी, कोविड व नॉन कोविड रुग्णांवरील उपचारासाठी नियोजन, मास्कचा व सॅनीटायझरचा वापर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, खेड परिसरात कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना सोबतच स्वयंशिस्त महत्वाची आहे. विलगीकरण प्रक्रीया काटेकोर राबवा. मास्क, सॅनीटायझरचा वापर, सोशल डिस्टनसिंग आदींचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे खेड तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी घेतली. मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने करण्याच्या सूचना दिल्या असून ते वेळोवेळी आढावा घेत असल्याचे श्री. राम यांनी सांगितले. खंडित वीज पुरवठा, पाणी पुरवठा तात्काळ सुरु करुन द्यावा, अशा सूचना करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन घेवून संबंधितांना मदत मिळवून द्यावी, असे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी श्री. राम यांनी खरीप हंगामातील कामांचाही आढावा घेतला. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात आली, याचा आढावा घेऊन उर्वरित शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
02/06/2020
औंध येथील जिल्हा रुग्णालयाची
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पाहणी
पुणे दि. 2 :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड (कोरोना कक्ष) केंद्राला भेट देवून पाहणी केली. रुग्णालयातील कोविड व नॉन कोविड रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांना मानसिक आधार देणाऱ्या समुपदेशन केंद्राचीही माहिती घेतली. या रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक करुन सर्वांचे मनोबल वाढविले. मानसोपचारतज्ज्ञ रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मनातील भीती घालवतात. रुग्णालयात किती दिवस रहावे लागेल, उपचाराची पद्धती याबाबत माहिती देतात. उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांचेही समुपदेशन केले जाते. जिल्हाधिकारी राम यांनी या कामाचे कौतुक केले.
रुग्णालयातील स्वच्छता आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समर्पित भावनेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, डॉ.बी.एन.काकणे, डॉ. संतोष देशपांडे, डॉ.शर्मिला गायकवाड व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
02/06/2020
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतला पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा
--विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे साधला संवाद
पुणे, दि. 2 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्हयांतील कोरोना परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, ससून रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे आदी सहभागी झाले.
डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय तयार होणाऱ्या नवीन हॉटस्पॉटवर देखील लक्ष देण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या भागातील रुग्णदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाययोजना करत आहेत. परराज्य व परजिल्हयातून प्रवास करुन आलेल्या तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व श्वसनाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे नागरिक, गरोदर महिला, लहान बालके यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत.
शासनाच्या नियमानूसार दर आकारणी न करता जादा दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशा रुग्णालयाची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी संबंधित अधिकारी व रुग्णालय प्रमुखांशी वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधून आवश्यक त्या सूचना देवून प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. पावसाळयाच्या तोंडावर कोरोना संसर्गाबरोबरच डेंग्यू, मलेरिया, स्वॉइन फ्ल्यू अशा अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी यावेळी दिली.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच झोपडपट्टी व प्रतिबंधीत क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, शेखर सिंह, मिलिंद शंभरकर, दौलत देसाई व डॉ.अभिजीत चौधरी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या जिल्हयातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रशासनाच्या अडचणी व राज्य शासनाकडून अपेक्षीत मदतीबाबत चर्चा करण्यात आली.